सध्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणी होऊनही शेतातील पिके उगवलीच नाही आणि जी उगवली ती पण कोमेजलेली, मरणासन्न अवस्थेत आहेत. ही दारुण परिस्थिती कवी राजाराम जाधव यांच्या मनात विचारचक्र सुरू झाले. अस्वस्थता, बेचैनीने त्यांना रात्रीची झोप लागेना. त्याचीच परिणती म्हणजे या पुढील दोन काव्य रचना होय…
– संपादक
1) अवदसा
सारेच बघतात ढगांकडे
डोळे एकटक लावून
मनात घालमेल सुरू आहे
आता काय करावे म्हणून !१!
शेताच्या बांधावर बसून
शेतकरी एकच करतो विचार
काय करावे सूचत नाही
झालाय तो बेजार !२!
कोमेजलेले कोंब आता
पाहा मरणासन्न झाले
पाऊस पाणी काही नाही
साकडे घालतो देवाले !३!
दुबार पेरणी केली तरी
कापूस सोया गेला वाया
मनधरणी करू कोणाची
कोणी दाखवेना दया !४!
आलीच कशी अवदसा
काही उमजेना आम्हाला
पुढचे दिवस कसे येतील
तेच ठावूक देव बाप्पाला !५!
2) हुलकावणी
ऐक नारे मेघराजा तू
का देतोस हुलकावणी
तुझ्या विना कसे होईल
आता डोळ्यात येतयं पाणी !१!
तुझा प्रवास लांबला
यात आमचा काय गुन्हा ?
एकदाचा पड धोधो
हिरवाई येऊ दे पुन्हा !२!
कोणत्या अमिन वादळाने
म्हणे तुझी झाली गोची
सारे शिवार मलूल झाले
पण चिंता वाढली आमची !३!
असा कसारे रुसला तू
जरा विचार कर ना आमचा
मृग आर्धडा कोरडा गेला
तरी टिपूस नाही पावसाचा !४!
शेतकरी राजा उदास झाला
म्हणून पडलाय त्याला घोर
काय करावे सूचत नाही
त्याने गळ्यात बांधावी का दोर !५!
मागे-पुढे असेच झाले
तर काय होईल त्याचे
संसार त्याचा उघडा पडेल
बरस जोरदार एकदाचे !६!
जोरदार बरस एकदाचे !!

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
