Thursday, June 19, 2025
Homeयशकथा"आमची माती" फेम शिवाजी फुलसुंदर

“आमची माती” फेम शिवाजी फुलसुंदर

खरं म्हणजे, दूरदर्शन मधील माझे एकेकाळचे वरिष्ठ अधिकारी, म्हणजेच साध्या भाषेत बॉस असलेले श्री शिवाजी फुलसुंदर साहेब हे दूरदर्शन मधून निवृत्त होताना “उप महासंचालक” या अति वरिष्ठ पदावरून निवृत्त झाले आहेत. पण आजही महाराष्ट्रात, घराघरात त्यांची ओळख आहे ती, दूरदर्शनच्या “आमची माती आमची माणसं” या कार्यक्रमाचे निर्माते म्हणूनच.

इतकं “आमची माती आमची माणसं” या ग्रामीण विकास विषयक कार्यक्रम आणि शिवाजी फुलसुंदर यांचं समीकरण निर्माण झालं आहे. आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना, त्यांना शुभेच्छा देत असताना, खेडेगावात जन्मलेले, शिकलेले शिवाजी फुलसुंदर पुढे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे चमकत गेले, ही त्यांची यशकथा आजच्या युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

शिवाजी फुलसुंदर ह्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील वडगाव (कांदळी) येथे २ जून १९५७ रोजी झाला. लहानपणापासूनच शेतीची आवड असल्याने ते शाळेत शिकत असतानाच वडिल आणि भावांबरोबर मोटा हाकणे, शेतीला पाणी भरणे इ. कामे आवडीने करत.

पुढे शालेय शिक्षणानंतर फुलसुंदर यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयातून बीएससी पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. त्या आणि आताच्याही पद्धतीनुसार त्यांनी युपीएससी, एमपीएससी या स्पर्धा परीक्षांची मळलेली वाट न निवडता वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी ते डिसेंबर १९८१ मध्ये ‘आमची माती आमची माणसं‘ या कार्यक्रमाचे निर्माते म्हणून मुंबई दूरदर्शन केंद्रात रुजू झाले.

खरं म्हणजे तेव्हाही आणि आताही माध्यम विश्वात चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य ही क्षेत्रे, विषय खूप ग्लॅमरस आहेत. त्या मानाने ग्रामीण विकास विषयक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करणे, हे अतिशय कष्टाचे होते आणि आहे. उन्हातान्हात गावोगावी जाणे, अनेक गैरसोयी सोसून चित्रीकरण करणे, पुढे त्याचे संकलन करणे, पुन्हा तो कार्यक्रम लोकप्रिय होईल हे पाहणे, हे सर्वच खूप आव्हानात्मक होते. त्यांच्या बरोबर मी काही काळ निर्मिती सहायक म्हणून काम केलेले असल्याने या सर्व गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे.

अर्थात ते स्वतः शेतकरी राहिल्याने, शिक्षणही शेतीविषयकच घेतल्याने त्यांना शेतकरी बांधवांना नेमके काय हवे याची जाण होतीच, पण सर्व कार्यक्रम, त्यांचे विषय, आशय सर्व सामान्य शेतकरी बांधवांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले पाहिजे, त्यांचा खरंच विकास झाला पाहिजे, ते सुखी समृद्ध झाले पाहिजे याची मना पासून कळकळ होती. म्हणुनच ते प्रत्येक कार्यक्रम दर्जेदार होईल, या साठी स्वतः अतोनात प्रयत्न करीत असत.

वर करणी रुक्ष वाटणारा ‘आमची माती आमची माणसं’ हा कार्यक्रम लोकप्रिय करण्यासाठी सर्व प्रथम त्यांनी त्या कार्यक्रमाचे शीर्षक गीत ज्येष्ठ कवी, गीतकार शांताराम नांदगांवकर यांच्या कडून
“ही काळी आई,
धन धान्य देई,
जोडते मनाची नाती,
आमची माती आमची माणसं,”
हे शीर्षक गीत लिहून घेतले. हे शीर्षक गीत केवळ ग्रामीण भागातच नाही तर, शहरी भागातही लोकप्रिय झाले, हे विशेष.

विनासायास स्टुडिओत कार्यक्रम करण्याऐवजीं
प्रत्यक्ष जागेवर जाऊन चित्रीकरण करण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला. त्यामुळे त्यांच्या सोबत असण्याचा मला व्यक्तिशः खूपच फायदा झाला. अन्यथा मी त्यांच्या विभागात जाण्यापूर्वी कमर्शियल सेक्शन, प्रेझेंटेशन युनिट अशा प्रत्यक्ष कार्यक्रम निर्मितीशी संबंधित विभागात काम करीत होतो, त्यामुळे मला दूरदर्शनच्या बाह्य चित्रीकरणाचा, संकलनाचा काहीच अनुभव नव्हता. तो त्यांच्या सोबत राहिल्याने मला मिळाला. त्या अनुभवाचा पुढे मला नेहमीच खूप फायदा झाला आणि आताही होत आहे.

अर्थात सर्वच विषय हे बाह्य चित्रीकरणातून मांडता येत नाही, त्यालाही काही मर्यादा येतात हे ओळखून त्यांनी १९८५ साली ‘गप्पागोष्टी‘ हा अभिनव कार्यक्रम सुरू केला. पुस्तकी भाषा टाळून बोली भाषेत, नाट्य स्वरूपात सादर होणारा, दैनंदिन जीवनाशी निगडित विषय, प्रश्न आणि त्यावर उपाय सुचविण्यात हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला.

आपल्या अवतीभवती वावरणारी माणसं वाड्याच्या सोप्यात, चावडीवर बसून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा मारत, हसत खेळत, एकमेकांना कोपरखळ्या देत शेतीची माहिती मस्तपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची. या कार्यक्रमाने स्वतःचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. या अभिनव कार्यक्रमाची बीबीसी ने देखील दखल घेतली होती.

शिवाजी फुलसुंदर यांच्या ‘ग्रीन गोल्ड‘ या पर्यावरण पूरक डॉक्यूमेंट्रीला चेकोस्लोव्हाकिया येथे इकोफिल्म – ८९ या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये ‘ॲवार्ड’ मिळाले. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन १९९३ मध्ये ‘वसंतराव नाईक पुरस्कार‘ मिळाला. महाराष्ट्र कला निकेतनचा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार‘ २००४ मध्ये देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने २००६ साली त्यांच्या कार्याचा तत्कालीन राज्यपाल एस्. एम्. कृष्णा यांच्याहस्ते ‘शेतीमित्र पुरस्कार’ देऊन गौरव केला.

शिवाजी फुलसुंदर यांनी ग्रामीण विकास विषयक कार्यक्रमांच्या निर्मिती बरोबरच, “सप्रेम नमस्कार”, “मिष्कीली”, “महाचर्चा”, “दीपावली”, “नवीन वर्षारंभ कार्यक्रम”, “राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयक कार्यक्रम, अपना उत्सव, दहीहंडी,गणेश विसर्जन, विधिमंडळ थेट प्रसारण ह्यासारख्या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन, नियोजन, निर्मिती, थेट प्रसारण असे अनेक कार्यक्रम, उपक्रम यशस्वीपणे केले.

पुढे २००६ साली “संचालक” म्हणून त्यांनी प्रसार भारतीच्या मार्केंटिंग विभागात कार्यभार सांभाळला. तिथेही त्यांनी त्यांच्या कौशल्याची छाप पाडली.

त्यानंतर ते २०११-१४ दरम्यान अहमदाबाद येथे “डी डी गिरनार” ह्या गुजराती वाहिनीचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. खरं म्हणजे बरेच अधिकारी, कर्मचारी हे इच्छित स्थळी बदली झाली नाही तर मनापासून काम करीत नाही, असा अनुभव येतो. पण
फुलसुंदर यांनी तसे न करता, तिथेही आपला ठसा उमटवला. याचेच “प्रतीक” म्हणून अहमदाबाद येथे असताना त्यांनी कल्पकतेने राबविलेल्या “मतदार शिक्षण आणि जनजागृती” या मोहिमेसाठी २०१४ साली राष्ट्रपती श्री. प्रणब मुखर्जी यांच्याहस्ते ‘नॅशनल मिडीया ॲवार्ड‘ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

२०१५ मध्ये ‘डीडी किसान’ या चॅनलचे दिल्ली येथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन झाले. या चॅनलचे कार्यक्रम नियोजन, सादरीकरण आणि प्रसारण करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. यासाठी तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांनी त्यांची विशेष नियुक्ती केली होती.

शिवाजी फुलसुंदर यांना दूरदर्शनच्या अनेक पुरस्कारांसोबत ओतूर येथील श्री. गजानन महाराज शिक्षण संस्थेचा ‘शिवनेरभूषण’ पुरस्कार”,
निवृतीपश्चात आरसीएफ तर्फे २०२० मध्ये “कृषी विस्तार आणि प्रसारण” या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

निवृत्तीनंतर नुसता आराम करीत न बसता ते “वंदे किसान” ह्या सामाजिक संस्थेच्या ऑनलाईन अनौपचारिक कृषीविषयक शिक्षण प्रकल्पात कार्यरत आहेत. त्यांनी “फेरफटका” हे कृषी, आरोग्य, संस्कृती आणि शिक्षण विषयक “युट्युब चॅनेल” ही सुरू आहे.

अतिशय मितभाषी, निगर्वी, कुणाच्याहि पाठीमागे कुणाच विषयी कधीही वाईट न बोलणारे, मदतीला सदैव तत्पर असे त्यांचे व्यक्तिमत्व नक्कीच अनुकरणीय आहे. माझ्याशीच संबधित एकच उदाहरण देतो, ते म्हणजे मी त्यांच्या सोबत काम करत असताना डोंबिवली येथे रहात होतो. त्यावेळी आणि कदाचित आताही असेल, “डोंबिवली ते दादर/ व्ही टी” असा लोकलचा प्रवास करणे म्हणजे मोठेच दिव्य असायचे. माझी पत्नी सौ अलका, ही फोर्ट मध्ये एमटीएनएल मध्ये कामाला होती. (तेव्हाचे बॉम्बे टेलिफोन्स) आम्ही डोंबीवलीत रहात असतानाच अलका गर्भवती राहिली. अशा स्थितीत ती दररोज लोकलमधून सुखरूप ऑफिसला जाईल की नाही ? गेली तर येईल की नाही ? लोकलमधील गर्दीचा गर्भावर काही परिणाम तर होणार नाही ना ? त्यात मी स्वतः जन्मल्यापासून सहा वर्षे बोलत नव्हतो, त्यामुळे तर अधिकच काळजी वाटत होती. ही माझी काळजी फुलसुंदर यांना सहजच बोलता बोलता सांगितली होती. त्यांच्या स्वभावाप्रमाणे, त्यावेळी ते काहीच बोलले नाही. पण दुसऱ्या दिवशी मुलुंड येथे, त्यांच्या भावाचे घर रिकामे असून, तुम्ही तिथे हवे तितके दिवस राहू शकता, असा आनंदाचा, आश्चर्याचा सुखद धक्का त्यांनी दिला. लगेच आम्ही मुलुंडच्या त्यांच्या भावाची घरी रहायला गेलो. काही डीपॉझिट नाही, काही करारनामा नाही. पुढे अलका चे बाळंतपण सुखरूप पार पडले. आणि आम्ही डोंबिवलीत स्वतःचे घर घेतल्यावर मुलुंडच्या त्यांच्या भावाचे घर सोडले. असो.

शिवाजी फुलसुंदर यांच्या या सर्व प्रवासात आईवडिलांचे आशीर्वाद, सर्व कुटुंबियांची साथ लाभली आहे. विशेष करून सौ शीला वहिनींनी घराची आघाडी समर्थपणे सांभाळली. त्यामुळं दोन्ही मुलं उच्चशिक्षित झालीत. मुलगा प्रतीक हा बी ई (बायोमेडिकल) एम एस, तर सून सौ ऋतुजा एम कॉम, एम एस  (फायनान्स) असून दोघेही अमेरिकेत असतात. तर मुलगी सौ प्रियांका, वाणिज्य पदवीधर तसेच भरत नाट्यम विशारद आहे तर जावई श्री पराग इंगोले, बी ई (केमिकल) हे सौदी अरेबियात आहेत.

असे हे मनमिळावू, सतत दुसऱ्याचा योग्य मान राखणारे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन शक्य ती मदत करणारे शिवाजी फुलसुंदर शतायुषी होवोत, या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मन:पूर्वक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. अशोक जी कुंदप डेअरी टेकनोलॉजिस्ट सातारा अशोक जी कुंदप डेअरी टेकनोलॉजिस्ट सातारा

    फुलसुंदर सरांचे दूरदर्शन वरील कामकाज मी आगदी जवळून पाहिले ते उत्तम प्रशासक असून त्यांचा शिस्तप्रिय स्वभावही अनुभावला आहे भुजबलसरानी त्यांच्या कार्याचा उत्कृष्ट जीवनपट रेखाटला आहे आज शिवजीरावांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व त्यांचेकडून असेच शेतकर्यांना उपयुक्त असे प्रबोधनाचे कार्य घडो एवढीच इच्छा आणि भुजबळ सराना अशाच प्रसिद्धी पासून लांब राहिलेल्या समाजसेवेचे वृत्त घेतलेल्या शिलेदारांची माहिती आपल्या न्युज स्टोरी टुडे या वेब पोर्टल मध्ये समाविष्ट करण्याची प्रेरणा मिळो एवढीच आम्हा कुंदप कुटुंबाची इच्छा

  2. राजेश सिताराम पवार, वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी निवृत्त दूरदर्शन राजेश सिताराम पवार, वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी निवृत्त दूरदर्शन

    प्रथम सर, जन्म दिन शुभेच्छा,,,, नावा प्रमाणेच धडाडी,, जन समुदाय बांधनी, धड़ाडी चे काम अन स्वभाव मनमिळावु,, माझे वरिष्ठ असले तरी सोबत घेउन समजाउन घेणे,,,,ऐसे कमाचे कसब,,,, खुप सारे अनुभव अविस्मरणीय,,, सर आपनास कोटि कोटि प्रणाम

  3. शिवाजी फुलसुंदर हे माझे पुणे येथील कृषी महाविद्यालयातील वर्ग मित्र. काही माणसाचे चेहरे बोलके व प्रतिबिंबित आसतात. त्यापैकी एक माझे मित्र शिवाजी. शिवाजी यांचा चेहरा जसा अतिशय प्रसन्न,आनंदी,आकर्षक तसाच त्यांचा स्वभाव- बोलणे – वागणे सहकार्याचे, प्रेमाच व समजूतदारपणाच. भुजबळ सर आपण जे अनुभवले व त्याच जे उत्कृष्ठ वर्णन केले आहे हे सर्वासाठी प्रेरक आहे. प्रिय मित्र शिवाजी आपणास वाढदवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपणास दिर्घ निरोगी, सुखी,समाधानी, निरंतर उत्साही आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  4. श्री शिवाजीरावांच्या या माहिती लेखातील प्रत्येक शब्द मी पण अनुभवला आहे असे जाणवले। खूपच प्रेमळ व कर्तृत्ववान व्यक्ती जी कायमच जमिनीवरून चालते फिरते।

  5. अप्रतिम आणी उत्तम लेखन.आम्हाला शिवाजी फुलसुंदरसाहेब आपला अभिमान आहे.आपण कित्येक तरूणांचे आदर्श आणी स्फुर्तीदाते आहात.
    शशिकांत देशपांडे.

  6. मा.श्री.शिवाजी फुलसुंदर यांस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ! त्यांनी केलेल्या कार्यास सलाम !
    अगदी मोजक्या शब्दात,शिवाजी साहेबांचे जीवन सार, श्री. भुजबळ सरांनी खूपच सुंदर मांडले आहे.
    धन्यवाद सर !

    सौ.वर्षा भाबल.

  7. शिवाजी फुलसुंदर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खरोखरचं त्यांनी ,,आमची माती ,अमची माणसं ,,हा कार्यकम अजरामर करून टाकला .ते एवढ्या साऱ्या
    पुरस्काराचे खऱ्या अर्थाने मानकरी आहेत .
    त्यांच्या विषयी एवढी सविस्तर माहिती वाचुन आनंद वाटला .धन्यवाद। 🙏🙏🙏🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…