जगभरात आजमितीला तीस कोटींपेक्षाही अधिक मधुमेही रुग्ण असून भारताला या आजाराने आपली “राजधानी” बनवली आहे. अशा या मधुमेहापासून स्वतः ला कसे वाचवावे ? सांगताहेत ज्येष्ठ फिजिशियन डॉ अच्युत बन. डॉक्टर साहेबांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
मधुमेह हा कधीही बरा न होणारा आजार आहे, हे
मधुमेहाबाबतचे एक कटू सत्य आहे. मानवाला ग्रासणार्या ह्या व्याधीचा कसा प्रतिकार करावा, या जीवघेण्या आजाराकडे आपले दुर्लक्ष होऊ नये,
या सर्व बाबींबाबत जन जागृती व्हावी यासाठी १४ नोव्हेंबर रोजी जगभर मधुमेह दिन साजरा करण्यात येतो.
“रोजचेच मडं त्याला कोण रडं” अशी एक बोलकी ग्रामीण म्हण आहे. जवळपास अशीच अवस्था मधुमेही रुग्णाच्या मनाची होत असते. सतत पथ्य, महिन्याला रक्त तपासण्या आणि रोज रोज खावाव्या लागणाऱ्या खुप सार्या औषधी गोळ्या यामुळे काही मधुमेही कंटाळून जातात. नित्याची भरमसाठ औषधी तर कधी कधी इन्सुलिनची तीनतीन इंजेक्शन्स टोचून घेणे, ह्या गोष्टींचा बहुतेकांना कंटाळा आलेला असतो.
यातून काही रुग्ण हलगर्जीपणा करतात. कधीकधी अत्यावश्यक औषधाला फाटा देऊन अप्रमाणित उपचार सुरू करतात. त्यामुळेच कधी कधी अक्षम्य दुर्लक्ष होते.
अशाप्रकारचे दुर्लक्ष जीवावर बेतणारे ठरू शकते.
असंसर्गजन्य आजारांचा “राजा” म्हणजे मधुमेह !
संसर्गजन्य आजाराचा मारही तितकाच जीवघेणा असतो याची प्रचिती कोरोनाच्या महामारीमधे सर्वांनीच घेतली आहे.
असंसर्गजन्य आजारात मधुमेह व उच्चरक्तदाब हे मोठे आजार मोडतात.
उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे एकमेकांचे सख्खे भाऊच जणू आहेत. हे दोघेही मानवजातीचे “छुपे मारेकरी” म्हणून कुप्रसिद्ध आहेत.
बर्याचदा हे दोन मित्र मानवी शरीरात दबा धरून बसलेले असतात. जेव्हा या रोगांचे निदान होते तेव्हा बराच उशीर झालेला असतो.
लहान थोर, गरीब, श्रीमंत, शहरी, ग्रामीण असा भेदभाव मधुमेह करत नाही. आजकाल तर समाजाच्या अनेक थरांमधे हा आजार धुमाकूळ घालतो आहे.
सन 2010 मधे सुमारे 40 लाख लोक या आजारामुळे जग सोडून गेले.
मधुमेहामुळे हृदयरोग, ब्रेन अटॅक, मुत्रपिंड आजार, पायांचे आजार व डोळ्यांची नजर जाणे हे घातक प्रकार अनेक पटीने वाढतात.
मधुमेह योग्य प्रकारे ताब्यात ठेवला तर वरील अपाय खुप कमी प्रमाणात होतात.
रक्तातील साखरेचे प्रमाण सातत्याने प्रमाणात ठेवणे ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. त्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
मनाचा निग्रह आणि उपचार करणाऱ्या तज्ञ डाॅक्टरांचा सल्ला या दोन गोष्टीतून मधुमेहावर नक्कीच ताबा मिळवता येतो.
मधुमेह समूळ नष्ट होत नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु हा आजार सातत्याने “ताब्यात” ठेवता येतो. आजार ताब्यात ठेवणे ही देखील मोठी उपलब्धी ठरते.
योग्य आहार, नियमित व्यायाम, ठराविक दिवसांनी रक्त तपासणी आणि तज्ज्ञांकडून औषधोपचार या चार बाबी मधुमेहाच्या उपचारात अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
” टाईप-2″ ह्या प्रकारचा मधुमेह जगामधे प्रामुख्याने आढळून येतो. उरलेले 5% मधुमेही रुग्ण “टाईप-1” या प्रकारात मोडतात. या टाईप-2 मधुमेहींना जन्मभर इन्सुलिन घेत राहावे लागते.
आजकालची तरूण पिढी या रोगाचे मोठ्या प्रमाणावर भक्ष्य ठरत आहे ही काळजीची बाब वाटते. त्याची कारणेही आता सर्वांना ज्ञात झालेली आहेत. जीवनात चाललेली सततची धावपळ, सातत्याचा ताणतणाव, व्यायामाचा अभाव आणि आनुवंशिकता ही काही प्रमुख कारणे मधुमेहाचा प्रादुर्भाव वाढवणारी आहेत.
मधुमेहासाठी केवळ आणि केवळ आधुनिक उपचार उपयुक्त आहेत.
जोडीला रोज जलद चालणे, गोडधोड कमी अथवा न खाणे व आपले आयुष्य सहजपणे जगायला शिकणे खुप महत्त्वाचे आहे. दररोज जलद चालणे हा पुरक उपचार समजावा इतकं ते उपयुक्त असते.
चाळीस टक्के औषधीचा असर, तीस टक्के जलद चालल्यामुळे होणारा फायदा तर उरलेले तीस टक्के फायदा हा योग्य आहार नियंत्रणातून मिळतो. अर्थात हा एक ढोबळ असा सल्ला आम्ही रुग्णांना देत असतो.
कुठलीही एकच एक गोष्ट मधुमेह उपचारासाठी पुरेशी नसते. तज्ज्ञ डाॅक्टरांचा नियमितपणे सल्ला घेऊन सातत्याने उपचार करणे खुप महत्वाचे असते. मधुमेहाचा बाऊ न करता “मधुमेहासोबत” सहज जगता आले तर या रोगाची भिती कमी होईल.
मधुमेह होण्याची कारणे समजून घेऊन वेळीच काळजी घेतली तर मधुमेह टाळता येऊ शकतो. किमान तो लांबवता येऊ शकतो.
चला, तर मग आपण सगळे मधुमेह टाळण्याची शिकस्त करू या.

– लेखन : डाॅ अच्युत बन. नांदेड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800