खानदेशात अक्षय तृतियेच्या सणाला आखाजी म्हणतात.
प्रामुख्याने शेतीप्रधान असलेल्या या प्रांतांत शेतकर्यांचा हा मोठा सण आहे. या दिवशी पाटावर धान्य पसरुन पाण्यानं भरलेल्या मातीच्या घटाची पूजा केली जाते. यास घागर भरणे असेही म्हणतात.
घटावरच्या मातीच्या ताटलीत खरबुज, आम्रफल ठेवले जाते. चंपक मोगरा, आंब्याची डहाळी यांची सुंदर सजावट घटाभोवती करतात.
या सर्व विधीला नैसर्गिक आणि भौगोलिक संदर्भ आहेत. नुकताच वैशाख महिना सुरु झालेला असतो. हवेत ऊष्मा असतो. एक प्रकारे वरुण देवतेची ही आराधना असते. माती ही तर शेतकर्यांची माय. घटाच्या रुपात तिलाही पूजले जाते.
या महिन्यात कलींगडे खरबुज, आंबे अशा गारवा देणार्या फळांचे भरपूर ऊत्पन्न असते. म्हणून पूजेत प्रतिकात्मकरित्या ती अर्पण केली जातात.
पुरणपोळी, आंब्याचा रस, तांदळाची खीर, असा नैवेद्य अर्पिला जातो. माहेरवाशिणी येतात. झाडाला झोका
बांधून ऊंच झोके घेतात. गाणी गातात. असा हा सुंदर ग्रीष्म ऋतुचे स्वागत करणारा मनभावन सण आहे.
आपल्याला प्रामुख्याने हे जाणवते की आपल्या संस्कृतीचे निसर्गाशी किती घट्ट नाते आहे ! वसंत सरतो, ग्रीष्म येतो. नंतर येणार्या वर्षा ऋतुची बीजे ग्रीष्माच्या उदरात असतात …म्हणून सर्वांचे स्वागत आहे.
निसर्गचक्र म्हणजेच जीवनचक्र. ही महान शिकवण या सणाच्या निमित्ताने निसर्गच मानवाला देत असतो.
असा हा अक्षय सुखाचे दान देणारा पारंपारीक सण भक्तीभावाने सर्वत्र साजरा केला जातो.

– लेखन : राधिका भांडारकर. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800