महात्मा गांधी, संत गाडगे महाराज यांनी हातात झाडू घेऊन सार्वजनिक संडास तसेच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली परंतु त्यांचे “स्वच्छ भारत”चे स्वप्नं साकार झाले नाही. त्यानंतर शासनाने अनेक वेळा “स्वच्छता अभियान” जाहीर केले. अनेक सेलिब्रिटीसह नेते मंडळीनी हातांत झाडू घेऊन फक्त अभिनय केला व अभियान पार पडले. सर्व वर्तमानपत्रात फोटो आले. सरकारने कर्तव्य पार पाडले.
आज महात्मा गांधी अथवा संत गाडगे महाराज नसले तरी त्यांच्यापेक्षा दोन पाऊले पुढे असणाऱ्या सामान्य वाटणाऱ्या परंतु असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्ती “शून्य कचरा” मोहीम अनेक वर्ष राबवत आहेत. त्यांपैकी ठाणे येथील श्री कौस्तुभ ताम्हनकर यांचा उल्लेख करावा लागेल .
ताम्हनकर यांनी २००६ पासून ही मोहीम राबवण्यास सुरवात केली. घरची स्वच्छता करता करता त्यांना असे वाटले की आपणच कचऱ्याचे निर्माते आहोत. पुष्कळसा कचरा आपणच करतो. कचऱ्यात वापरलेल्या वस्तू जास्त असतात. जर त्यांचा पुन्हा वापर केला तर कचऱ्याचे प्रमाण कमी होईल. त्यांच्या मते “टाकायचे नाही”, हेच शून्य कचरा संकल्पनेचे सार आहे.

सर्व प्रथम ताम्हनकर यांनी घराच्या दारावर “शून्य कचरा – येथे कचरा तयार होत नाही” अशी पाटी लावली त्यामुळे त्यांनी स्वतःहून स्वतःवर बंधन घालून घेतले. ही पाटी वाचून अनेक जण या मोहीमेबद्दल माहिती विचारू लागले व काहीजण त्या मोहिमेत सहभागी झाले. त्यांनी ही माहिती पुस्तक रूपाने प्रसिध्द केली आहे. सध्या त्याच्या मराठीत दहा हजार, हिंदीत एक हजार, गुजरातीत एक हजार प्रती, इंग्लिश मधील एक हजार प्रती वितरित केल्या आहेत. मराठीतील ई -बुक तयार आहे. या विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यान दिले आहे. ईटीव्ही, झी२४ तास या वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. टाकाऊ प्लास्टिक पासून त्यांनी पंचेचाळीस हजार प्याकिंग पाउच तयार केले आहेत .
ताम्हनकर यांच्या मते ठाणे महानगर पालिका क्षेत्रांत चारशे एक्कावन्न माणसे कचरा करतात व त्याचे व्यवस्थापन एक माणूस करतो. सध्या ४०३२ माणसे कचरा व्यवस्थापन करण्यासाठी राबत आहेत. शून्य कचरा मोहीम राबवली तर कचरा
व्यवस्थापनासाठी होणारा करोडो रुपये खर्च वाचू शकतो.

सध्या सम्पूर्ण शहराचा कचरा कोठे जमा करायचा ? व त्याची विल्हेवाट कशी लावायची ? ही मोठी समस्या आहे. कचरा निर्मूलन झाले तर आपोआप रोग निर्मूलन सुध्दा होऊ शकते. सर्व नागरिकांनी शून्य कचरा मोहिमेत सहभाग घेतला तर महात्मा गांधी व संत गाडगे महाराज यांचे “स्वच्छ भारत”चे स्वप्नं साकार होईल. हया मोहिमेसंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी प्रत्येकाने श्री कौस्तुभ ताम्हनकर यांचे “शून्य कचरा” हे अवघे पन्नास पानी पुस्तक संग्रही ठेवावे. त्यांचा email –kdtamhankar@gmail.com मो. 9819745393
१४ ऑक्टोबर हा कौस्तुभ ताम्हनकर यांचा जन्मदिन आहे.

— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत -रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800