“मीनाकुमारी”
मीनाकुमारी; जिला कधीही घरातील परिस्थितीमुळे शाळेत जाऊन शिक्षण घेता आले नाही, कलेचा वारसा जन्मत: घेऊन आलेली प्रतिभावंत कवयित्री, रसिक प्रेक्षकांच्या मनात विराजमान झालेली,समजावयास लागलेल्या जाणत्या वयापासून सातत्याने खऱ्या प्रेमाच्या शोधात मग्न असलेली, अत्यंत सुंदर देखणी, मूर्तिमंत नखशिखांत सौन्दर्य लाभलेली, अशी एकमेव अभिनेत्री की, जिला अभिनय कधी करावाच लागला नाही, की शिकावा लागला नाही. जणू काही तिच्या रोमारोमातच तो भिनलेला होता. आपल्या वाट्यास आलेल्या सर्व भूमिकांना न्याय देत समरस होऊन जगणारी, अवतीभवती सदैव तिच्यावर नजर ठेवून असलेले नातेवाईक अन सहकलाकार यांना तिची खरी आस, प्यास, अन ध्यास कधी कळलाच नाही.ज्या खऱ्याखुऱ्या प्रेमासाठी ती आसुसलेली होती, त्याचा शोध घेत होती, ते चित्त अन हृदय धडकायला लावणारे अस्सल प्रेम तिला सदैव हुलकवणी देत राहिले. अनेकांनी तिचा पैशासाठी उपयोग करून घेतला, परंतु तिचे संवेदनशील तरल बावरे मन कधीच कोणाला समजले नाही. इतका दैवदुर्विलास दुर्भाग्याने जिच्या वाट्यास आला, काहिनी आणवला,अशी ती मोहक,मासूम, जिच्या आवाजात कातर वेळेचा गुंजाईश नर्म दर्द होता,तिचे संभाषण म्हणजे दर्दभरी दास्तान च होते, अशी सर्वश्रेष्ठ कलाकार”अभिनय सम्राज्ञी “जिच्या समोर सर्वच कलाकार नतमस्तक होत तिला दुःखाच्या खाईत लोटणाऱ्या या भोवतालच्या स्वार्थी दुनियेतून जावून 52 वर्षाचा काळ लोटला ती म्हणजे “अभिनय समृद्ध सम्राज्ञी मीनाकुमारी”.

चित्रपटात भूमिका करताना समोर कोणीही कलाकार जरी असेल तरी मीना कुमारी ह्या स्वतःच्या प्रतिभावंत आदाकारी संपूर्ण पडदा व्यापून प्रेक्षकांच्या रसिकतेला मान देत असत. रसिकांच्या हृदयात खोलवर शिरत त्या आपली भूमिका जगत असत. जनमानसात अन मोहमयी चंदेरी दुनियेत आपले स्वतःचे स्थान पक्के करून एखाद्या महाराणी सम्राज्ञी प्रमाणे वावरणारी महा कलाकारा फनकारा मीनाजी 31 मार्च 1972 रोजी ही चमकती दुनिया सोडून अलविदा करून गेली खरी, पण तिच्या अभिनय व दर्दभरी आवाजावर, तिच्या शेरोशायरी वर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या निस्सीम चाहत्यांच्या मनात, हृदयात कायमचे घर करून गेली. बहुतेक मरणोत्तर प्रेमच तिच्या भाग्यात लिहिलेय विधात्याने, असे अलौकिक अष्टपैलू व्यक्तिमत्व कायमचे पडद्या आड गेले.
मीनाकुमारीच्या कल्पनेतील तिला हवंहवेसे खरखरं भावणारे पवित्र प्रेम, नि:स्वार्थी, निष्पाप, निरागस तिचे मन अन तिच्या तरल भाव भावनेचा कदर व आदर करणारा साथीदार तिला नं मिळाल्यामुळे तिच्या जीवनात उरला तो फक्त अन फक्त भकास उदास एकटेपणा…. तनहाई … त्याच दुःखात चूर होऊन, मशगुल राहून, भग्नतेने शेवटी तिने मदिरेचा आधार घेत, दुःख विसरू लागली. या स्वार्थी मोहमयी खोट्यारड्या चमकत्या दुनियेत जगण्यापेक्षा मृत्यूला कवटाळण्यासाठी व्यसनांच्या आधीन राहात मिठी मारत सरळ सरळ मरण पत्करले !! एक स्त्री सुलभ भावना जागवणारी जिला संसार एक प्रेमळ पति अन स्व अपत्य एव्हढीच माफक अपेक्षा होती. परंतु मीनाकुमारी च्या बाबतीत ईश्वराने (अल्लाने) तिची इच्छा पूर्ण करू नये हे आजपर्यंत न उमजलेले कोडे आहे.एक सुंदर जिवंत शिल्प, संवेदनाशील कवयित्री, माणुसकीने ओतप्रोत भरलेले मन अन गुंजाईश नर्म दर्द आवाज या सर्वांचा अंत पाहणे रसिक प्रेक्षकांच्या नशिबी आले.जन्मास येऊन तिने या भौतिक रूपात यश, कीर्ती, प्रसिद्धी, पैसा, गाडी, बंगला, सर्वकाही मिळवले, पण स्वतःचे आयुष्य मात्र मनपसंद, मनसोक्त हवेतसे जगू शकली नाही, हिच दुर्दैवाची गोष्ट आहे.एव्हडेच खरोखर खरे !!!!

प्रीत तुझ्यावर करूनी
अल्लड पणे निकाह
केला अपेक्षा ममतेने
हाय नशिबाने दगा दिला
तुझ्या घातक बंधनाने
माझी सुंदरता अन प्रतिभा
चमकते चंदेरी दुनियेमध्ये
तुला न ती बघवली कधी
करूनी अवहेलना सातत्याने
खूप मी रचले इमले भले
प्रिती अन सुख स्वप्नांचे
मला तु तर फक्त वापरले
अन व्यसनात मी गुरफटले
सर्वच की माती मोल झाले

— लेखन : सौ. मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

मीनाकुमारीची सविस्तर माहिती कळली मीना. मुखवट्याच्या मागचा चेहरा कसा असतो नं?