शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत सर्वद फाउंडेशनतर्फे डहाणू येथील स्वातंत्र्यवीर सावरकर ट्रस्ट संचलित बालनंदनवन विद्यालयात नुकताच शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते नववीच्या ५०४ आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संचालक श्री. प्रताप गायकवाड व मुख्याध्यापिका श्रीमती मानसी पाटील यांनी सर्वद फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. संपूर्ण शिक्षकवृंदाच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.

परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न आकारता दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेच्या कार्याबद्दल उपस्थितांनी मनापासून गौरवोद्गार काढले.
यावेळी श्री. प्रताप गायकवाड यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सामाजिक व कौशल्यविकास प्रकल्पांची माहिती दिली, तर मुख्याध्यापिका श्रीमती मानसी पाटील यांनी सर्वद फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
सर्वद फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सुचिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि जीवनातील यशाचा मार्ग याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यानंतर सर्वद फाउंडेशनचे पदाधिकारी श्री. अमित मटकर, तृप्ती सावंत, श्री. सचिन तेली, श्री. राहुल वरक, दर्शना गमरे आणि श्री. सचिन पोस्टूरे यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास सर्वद फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. चंद्रशेखर देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारा आणि समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित करणारा हा उपक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

सर्वद फाऊंडेशन चा अतिशय स्तुत्य उपक्रम. सुंदर समाजोपयोगी उपक्रम.