Saturday, May 17, 2025
Homeबातम्याहैदराबाद : बाल मेळावा पुरस्कार सोहळा

हैदराबाद : बाल मेळावा पुरस्कार सोहळा

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, (मातृ शाखा पुणे) आणि संस्थेच्या हैदराबादच्या अध्यक्षा सौ मीनाताई खोंड आणि कलाभिषेक परिवाराच्या सौ सरोजताई घारापुरीकर यांनी नुकतेच “बाल मेळावा पुरस्कार” सोहळ्याचे आयोजन केले होते.

कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

स्वरा बिराजदार या अनेक पुरस्कार मिळविणाऱ्या मुलीने “सरस्वती वंदना” म्हटली. तिचा स्मृतिचिन्ह रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्र देऊन सत्कार केला. तसेच सुवर्ण कन्या श्रीलक्ष्मी घोनसीकर सुवर्ण कन्या इयत्ता 6 वी हिने तेरा सुवर्ण पदकं मिळविणारी ३५ प्रशस्तिपत्र पटकावले. हिचा स्मृतिचिन्ह रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्र देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान बाल साहित्यिक आणि प्रकाशक श्रीमती मंजिरी ताम्हणकर, पुणे यांनी भूषविले.

प्रमुख पाहुण्या म्हणून स्वाती जयदीप राजे या आसनस्थ होत्या. त्या एम फील असून सर्वोत्कृष्ट बाल साहित्याचा पुरस्कार, भाषा फौंडेशन या संस्था स्थापना, भाषेचे संवर्धन आणि जतन प्रश्न मंजुषा आणि फिरते वाचनालय यासारख्या योजना राबवित आहेत. या दोहोंचा मीनाताईंच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

मीनाताई खोंड यांनी, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य या संस्थेची वाचन, लेखन, संवाद, संस्कार संस्कृती आणि व्यक्तिमत्व विकास ही उद्दिष्ट सांगितली. त्या म्हणाल्या की, “मुलांना वाचनाची, संवादाची आणि लेखनाची आवड, बालपणापासून लावायला हवी. हैदराबाद शाखेला मिळालेला प्रतिसाद पहाता, येथील मुले फार हुशार आहेत. सगळ्या स्पर्धांमधून भाग घेत असतात. चित्रकला, श्लोक स्तोत्र पठण, कविता सादरीकरण, निबंध लेखन, इत्यादी उपक्रमात भरभरून सहभाग असतो.
इथे शाळेत मराठी विषय नाही. त्यामुळे पाल्यांना मराठी शिकविण्याची जबादारी पालकांची आहे आणि ती त्यांनी स्वीकारावी. ही विनंती त्यांनी पालकांना केली. असाच लोभ आणि सहकार्य मिळत राहो त्यांनी आवर्जून सांगितले.”
“पालकांनी मराठीचा वारसा पुढी पिढीला देण्याचे वाचन दिले .”

मीनाताईंनी, आपली आई, कवयित्री वसुमती काकडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवलेला पुरस्कार, हैदराबादेतील सुप्रसिद्ध कवी आणि गझलकार श्री व्यंकटेश कुलकर्णी यांना देण्याचे घोषित करताच, टाळ्यांच्या गजरात स्वागत झाले आणि त्यांना शाल, नारळ, स्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र आणि रोख रक्कम असा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बालकांना विविध उपक्रमांतर्गत सहभागाकरीता पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कविता स्तोत्र श्लोक सादरीकरण करणाऱ्यांना बालकांना प्रशस्ती पत्रक दिले आणि प्रत्येक मुलामुलीला पुस्तक बक्षीस दिले. कार्यक्रमात 65 पुस्तके बक्षीस दिलेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुस्तकं नसलेले घर आवडत नसे. मुलांना ही गोष्ट सांगून त्यांच्या शिकवणुकीनुसार आपल्या घरी पुस्तकाचे कपाट करायला मीना ताईंनी सांगितले.

श्री प्रवीण कावडकर यांनी कार्यक्रमाचे. सूत्र संचालन उत्तम केले. शुभांगी ताई परळीकर, वर्षा पोतदार, शैलजा जोशी आणि निशांत घारापुरीकर यांचे सहकार्य लाभले.

डॉ. विद्या देवधर म्हणाल्या की, “कुठल्याही स्तुत्य आणि जनजागृतीच्या उपक्रमात मी माझ्या क्षमतेप्रमाणे सहयोग कायम देईन. बाल साहित्यासाठीची ही चळवळ अशीच धगधगती राहो आणि हैदराबादचे नाव सर्वात पुढे येवो. संस्थेला शुभकामना.”

यांनतर स्वाती राजे यांनी पालकांना उद्देशून संबोधिले. “बालसाहित्याचा प्रवास कसा खडतर असून त्यांनी ‘एम फील’ ला हा विषय घेतला तेव्हा, केवळ त्या एकच विद्यार्थिनी होत्या हे सांगितले. या वर्गाकडे पाहण्याची किती उदासीनता आहे. बालसाहित्य हा प्रकार प्रथम लंडनमधून उदयास आला असे सांगत त्या म्हणाल्या की, बालकांना शाळेच्या सुट्टीत चक्क रोजगारावर वेठबिगार म्हणून राबविले जात असे. कल्पना शक्तीचा चुराडा होत असे. तेव्हा पालकांनो, मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करा. त्यांना पुस्तके आणून द्या. त्यांच्याबरोबर, दिवसातील निदान २० मिनिटे तरी बसा आणि मग चमत्कार पहा. मुले तुम्हाला आणि पुस्तकांना कसे चिकटून रहातील ते. वेळ हा काढावा लागतो.”

श्रीमती मंजिरी ताम्हणकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, “आमची बाल साहित्य विषयक प्रकाशने ही अगदी अल्प किंमतीत उपलब्ध असतात. पूर्वी रू. ५/- किंमतीची ही पुस्तके आता फक्त रू. १५/- मात्र मधे उपलब्ध आहेत. अहो. छान मजेदार किस्सा त्यांनी कथन केला हा त्यांची गड किल्ल्यांवर बरीच पुस्तके आहेत. पूर्वी शिवनेरी अथवा सिंह गडावर बऱ्याच प्रति हातोहात संपायच्या. आता गडांवर पर्यटक जातात. पिठले भाकर, खेकडा भजी, ताक खाऊन मजा मारतात आणि विशेष गमतीची बाब म्हणजे काही शिल्लक परत द्यायची असल्यास त्या हॉटेल मालकाने आमचे पुस्तक देऊ केले तर पालकच सांगतात, “नको नको त्यापेक्षा आम्हाला कुरकुरे द्या.” “अहो, आड्यातच नाही तर पोहऱ्यात तरी येणार कुठून !” तर, पालकांनो आपली मुलं ग्रंथालयातून पुस्तके वाचायला घरी आणतात की नाही. आणली तर ती वाचतात की नाही यावर बारकाईने तुमचे लक्ष असू द्या.”

सरोज घारापुरीकर यांनी खंत व्यक्त करतांना सांगितले की, “आपल्या शाळाबाहेरील शाळेतील विद्यार्थी फार हुशार आहेत. परंतु घरची परिस्थिती फार दयनीय असल्याने त्यांना वाव मिळत नाही आणि हेच ओळखून कलाभिषेक परिवार त्यांना उत्तेजन देत उत्तम मार्गावर आणण्यास कार्यरत आहे.” “गेल्या २६ वर्षांच्या कालावधीचा त्यांनी आढावा घेतला. हल्लीचे युग हे फास्ट टॅग चे युग आहे. त्यामुळे पालकांकडे आणि मुलांकडे वेळ नाही. तरीही काही आज्या आपल्या नातवंडांना घेऊन येतात, सहभागी होतात ही कौतुकाची बाब आहे. पण कार्य चालूच ठेवायचे.”

समारोप करतांना आभार व्यक्त मीनाताई खोंड यांनी केले. त्या म्हणाल्या, “शब्दातून आभार जरी मानले जात असले तरी मिळालेली मदत ही नेहमी हृदयात सांभाळून ठेवली जाते.” नाव निहाय आभार मानत, आपले यजमान प्रा. विनायक खोंड हे कार्यक्रमाचे प्रायोजक असल्याचे सांगूत आर्थिक मदतीकरिता त्यांचेही आभार मानले आणि सोहळा संपन्न झाल्याचे जाहीर केले.

या नंतर, बालकुमार साहित्यच्या मुलांनी मराठी कविता जोशपूर्ण तर कधी भावुक सादर केल्या. कलाभिषेकच्या घारापुरीकर कुटुंबातील मुलांनी पोवाड्यातून अफझलखानाचा वध हे नाट्य अप्रतिम सादर केले आणि श्रोत्यांची वाहव्वा मिळविली.
पालकांनी, श्रोत्यांनी मनापासून कार्यक्रम आवडल्याची पावती दिली.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800*

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on आमचा वाडा…
कविता बिरारी on पहलगाम
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on स्नेहाची रेसिपी’ – १३
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ४८
विजया वाळुंज on जशाच तसे
अरविंद विनायक ढवळे on “पद्मश्री” उदय देशपांडे
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी on माझी जडणघडण : ४८
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम गोंधळ : संनियंत्रण आवश्यक
Pratibha Saraph on काही अलक
शितल अहेर on जशाच तसे
प्रदीप पाटील on जिचे तिचे आकाश : ८