“नऊ आठ”
मुंबईच्या लोकल ट्रेनला जीवनदायिनी म्हणतात. सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर लाइनवर या गाड्या दिवसरात्र लाखो लोकांना घेऊन ये जा करत असतात. विरार ते चर्चगेट आणि कसारा ते व्ही.टी. (छ. शिवाजी महाराज टर्मिनस) या मार्गावर त्या अक्षरशः कर्तव्य बुद्धीने धावत असतात. यातून प्रवास करणारा प्रचंड जनसमुदाय एकाच वेळी उदरनिर्वाहाबरोबर राज्याच्या विशाल औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आर्थिक, क्षेत्रात योगदान देत असतो. माणसांची ने आण करणारा हा लोकल ट्रेनचा प्रवाह मुंबई इतका सक्षम जगात कुठेही नसेल.
याच लोकल ट्रेनच्या माध्यमाचा मीही एक भाग होते. १९६४ ते १९७४ साल पर्यंत जवळजवळ दहा वर्षे मी महाविद्यालयीन शिक्षण आणि नंतर बँकेतली फोर्ट ब्रांच मधली नोकरी या निमित्ताने प्रवास केला. नऊ वाजून आठ मिनिटांनी ठाण्याहून व्ही.टी ला (छ. शिवाजी महाराज टर्मिनस) जाणारी गाडी या दहा वर्षात क्वचितच चुकली असेल. मात्र या 09:08 च्या लोकलला माझ्या आयुष्यात फार महत्त्व आहे. माझ्या जडणघडणीच्या प्रवासात तिचेही योगदान आहे.
माझी जडणघडण या लेखमालेच्या अंतिम टप्प्यावर असताना मला सतत वाटत आहे की जडणघडणीची प्रक्रिया ही सातत्याची आहे. याची समाप्ती नाही. पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत अव्याहत व्यक्तीची जडणघडण ही चालूच असते. आज “नऊ आठ” या लोकलची आठवण झाली आणि सहजपणे मी ५० वर्षांपूर्वीच्या काळाची पायरी उतरले. सकाळच्या ऑफिस टाईमच्या वेळी माणसांनी फुललेलं ते ठाणे स्टेशन, उंच लाकडी बोर्डवर लावलेले ते गाड्यांचे वेळापत्रक, गोंधळातही गाड्यांची सूचना देणारी ध्वनीक्षेपणातून चाललेली शांत निवेदने, ब्रिजवर जाण्याचे पायऱ्यांचे आणि रॅम्प पद्धतीचे जिने आणि त्यावरून पलीकडे प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या किंवा येऊन ठेपलेल्या गाडीला पकडण्यासाठी चाललेली लोकांची प्रचंड धावपळ, तो गाडी सुटतानाचा वाजणारा हॉर्न, वेळ वाचवण्यासाठी रेल्वे लाईन क्रॉस करणारी धाडसी माणसं, हिरव्या लाल अग्नीरथ गमनागमनदर्शक पट्टीका माझ्या डोळ्यासमोर एक आठवणींचा भरगच्च कोलाज आकारतात. या साऱ्यांचा मी एक भाग होते.
शाळा कॉलेजची इमारत असते, त्या इमारतीतून आपण इतिहास, भूगोल सायन्स, गणित यापैकी कुठल्यातरी विषयात प्राविण्य मिळवून पदवी घेऊन जीवन जगण्यास आता समर्थ झालो असा विश्वास प्राप्त करतो. माझ्यासाठी “नऊ आठ” ही लोकल म्हणजे त्या पुढचा टप्पा होता. चालत्या फिरत्या, गर्दीच्या बंदस्त आठ डब्यांच्या, विजेवर चालणार्या गाडीत मला मानवी जीवनाविषयिची व्याख्या सांगणारं एक व्यापक दर्शन घडलं. युगंधराच्या मुखात पार्थाला विश्वदर्शन झालं पण या भूतली, जीवनाची एक सहस्त्रांगी गंगा मला “09:08 च्या” लोकलमध्ये दिसली.
अगदी विद्यार्थ्यांपासून ते निवृत्तीच्या पायरीपर्यंत पोहोचलेली सगळी तरुण, मध्यमवयीन, प्रौढ, उतार वयाची माणसं त्या पाऊण तासाच्या प्रवासात भेटत. विद्यार्थ्यांची किलबिल, गप्पांचे विषय वेगळे. हळूच कुजबुजलेली ती वाक्यं आठवतात. ”अगं ! तुला कळलं का शिरीष ने शैलाला अखेर फसवलंच. आता कुणा अंजू नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलाय तो. बिच्चारी शैला !”
एखादी स्कॉलर बसायला जागा मिळो न मिळो त्या गर्दीतही ऑरगॅनिक केमिस्ट्रीची समीकरणे लिहीत असायची. हा रंगीबेरंगी तरुणांचा लोंढा गोंगाट घालत घाटकोपर, माटुंगा येथे उतरून जायचा. यात अभ्यासू होते, महत्त्वाकांक्षी होते, उनाडटप्पू, प्रेमात पडलेले, फसलेले, काव्यात बुडालेले सारेजण होते.
आमच्या या “09:08”च्या गाडीत कल्याणहून येणारी एक बाई नेहमी तीच ठराविक खिडकी पकडून बसलेली असायची. तशी ती फारशी तरुण नव्हती पण तिच्या चेहऱ्यावर भडक मेकअप असायचा. अंगावरची साडी म्हणाल तर त्यात कसलीच रंगसंगती नसायची. गाडीत आमची सर्वांची इतकी कलकल, बडबड चाललेली असायची तरी तिला मी कधीही कुणाशी बोलताना पाहिले नाही. आणि कुणी तिच्या वाटेला जातही नसत. तिच्या नजरेला नजरही भिडवत नसत. व्ही.टीला उतरून ती कुठे गायब व्हायची ते कधी कळलंच नाही. तिच्याकडे प्रवासी पास होता की नव्हता याची आम्हाला शंका असायची पण चुकून कधी टिकीटचेकर आला तरी तिला मात्र तो कधीच विचारायचा नाही. “हे काय गौडबंगाल होते ?” हा प्रश्न मात्र कायम मनात राहिला.
कुंदा, गुलाब, माणिक सारख्या नोकरी करणाऱ्या बऱ्याच महिला होत्या. गुलाब तर सतत धावत पळतच गाडी पकडायची. तिच्या रुंद कपाळावरची बारीक टिकली आणि त्यावरून केसांच्या गालावर लोंबकळणार्या दोन पातळ लांब बटा… काहीतरी मोहकता होती तिच्यात. माझ्यात आणि तिच्या वयात खूप अंतर होतं पण तरीही एक मैत्रीचा धागा तिच्याशी सहज गुंफला गेला होता. त्यावेळी नोकरी करणारी, दोन लहान मुलींची आई, नवरा, सासरच्या इतर माणसांची मनं राखून आनंदात राहणार्या गुलाबने त्या वयात एक छान ठसा मनावर उमटवला होता. कुंदा आणि माणिक या अविवाहित होत्या. त्यांनी विवाह का केले नाहीत ते कळले नाही कारण त्यांच्या वैयक्तिक बाबीत पडण्याचा कधी प्रश्नच आला नाही. मी त्यांच्याकडे त्या काळातल्या अत्यंत सक्षम आणि ताठ मानेने जगणाऱ्या स्वावलंबी, निर्णयक्षम स्त्रिया म्हणूनच पाहिले.
एक बाई घाटकोपरला गर्दीच्या लोंढ्यात ढकलल्यासारखी रोजच डब्यात शिरायची पण तिच्या नाकाशी धरलेलं सोनचाफ्याचं फुल त्या गर्दीतही तिच्या हातून कधी निसटलं नाही. याची आम्हाला खूप गंमत वाटायची. आज आठवलं की माझ्या मनात सहज येतं, आजूबाजूला कुठल्याही प्रकारची विचारांची, वागण्याची,नजरेतली दुर्गंधी असू देत पण तिने मात्र एका शाश्वत सुगंधाची साथ कधी सोडली नाही.
अशीच आणखी एक महिला होती. ती अक्षरशः दरवाज्यात मांडी घालून खाली बसायची आणि ४५ मिनिटांच्या या प्रवासात त्या कलकलाटातही गाढ झोप काढायची. अक्षरश: तो तिचा हक्काचा, एकटीचा आणि विश्रांतीचा काळ असावा.
एकदा गाडीतून उतरताना नकळत माझे गॉगल्स पडले. दुसर्या दिवशी सकाळी ऑफीसमध्ये जाताना लक्षात आले. “आता काय ?हरवले. नवीन घ्यावे लागतील.” “09:08” च्या वेळेला स्टेशनवर पोहचले. तेवढ्यात मागून एक “09:08”चा माझ्यासारखाच नेहमीचा युवा प्रवासी हसतमुखाने जवळ आला आणि म्हणाला, “गाडीतून उतरताना इतकी घाई करू नका हो ! काल फक्त गॉगल्सच पडले…” मी पटकन् त्याच्या हातून गॉगल्स घेतले. “थँक्स” म्हणेपर्यंत गाडी आलीच. एक अति शॉर्टफिल्म म्हणून सहज आठवले.
याच गाडीत कौटुंबिक चर्चा घडत, वर्तमानपत्रातल्या ताज्या बातमीवर मतं नोंदली जात, सासूच्या सुनेबद्दल, सुनेच्या सासूबद्दल तक्रारी असत. मुलांची आजारपणं, शिक्षणं, अभ्यास ते अगदी थेट लग्नापर्यंतच्या काळजा असत. घरातल्या वृद्धांच्या समस्या असत. कामाच्या ठिकाणच्या गंमती, स्पर्धा, त्याचबरोबर विक्षिप्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विचित्र कहाण्या ऐकायला मिळत. इतकंच नव्हे तर सवाष्ण, हळदीकुंकवासारखे पारंपरिक समारंभही घडत. संक्रांतीची वाणं लुटली जायची. “तिळगुळ घ्या आणि गोड बोला च्या” घोषणा त्या खडखडणाऱ्या गाडीच्या गर्दीत, नादात मजेत व्हायच्या. कुणाची विणकामं, भरतकामंही चालायची. ”छंदाला धरबंध नसतो” याचंं चालतं बोलतं उदाहरण होतं ते. कधी ठरवून साऱ्याजणी एकाच रंगाचे कपडेही परिधान करायच्या. केवळ एक गंमत म्हणून. एक छान वाचक क्लबही होता बरं का ! नामांकित पुस्तकांची देवघेव आणि त्यावर अभ्यासपूर्ण चर्चाही या “09:08 च्या” ४५ मिनिटाच्या वेळात व्हायच्या. पुल, वपु, रणजित देसाई, मंगेश पाडगावकर, विं.दा अगदी सगळे सगळे असायचे आमच्या या प्रवासात. कितीतरी दिवस आमच्याबरोबर प्रवास करणारी “जया काळे” ही विंदांची मुलगी आहे हे आम्हाला माहीतही नव्हते. जेव्हा कळले तेव्हा आम्हालाच आम्ही तिच्या मैत्रिणी म्हणून भारी वाटले. “जया” हा एक संपूर्ण विषय असू शकतो पण या लेखापुरतं मी इतकंच म्हणेन की सदैव जमिनीवर पाय असणाऱ्या या बुद्धिमान व्यक्तीने आचार विचारांचं सौंदर्य आमच्यात पेरलं.
मुंबईचा पावसाळा आणि लोकल गाड्यांचं बंद पडणं यातही असलेलंं एक वेगळंच थ्रिल आम्ही त्यावेळी अनुभवलं. आमच्या या गाडीत कधीकधी ठाण्याच्या प्रसिद्ध समाजसेविका विमल रांगणेकर सौ रेगे ताई, हजारे बाई (विजय हजारे या क्रिकेट पटुची आई) असायच्या कधी कधी महिलांसाठी ट्रेनमध्ये विशेष सुरक्षा, वाढीव डबे किंवा गाडीत बंद पडणारे पंखे वगैरे तक्रारी, मागण्या घेऊन आम्ही त्यांच्याबरोबर रेल्वेप्रशासनाविरोधी आंदोलनातही सहभागी झालोय. आतून काहीतरी उसळणं आणि त्यासाठी आवाज उठवणं म्हणजे काय याची किंचित झलक त्यावेळी आम्ही अनुभवली आणि या आठ-नऊ डब्यांच्या, लांबलचक, माणसांनी ठासून भरलेल्या गाडीत गळ्यात मोडकी पण सुरातली पेटी अडकवून गाणारे भिकारीही ऐकले. स्टीलच्या चार-पाच डब्यातून पोहे, ढोकळा, साबुदाण्याची खिचडी वगैरे विकणाऱ्या बायांकडून भूक शमवली. माळा, पिना, बांगड्या विकणारी छोटी निरागस शिक्षणास वंचित झालेली मुलेही पाहिली. एकीकडे या धावत्या गाडीत एक मोठा उद्योग समूह होता तर दुसरीकडे गरिबी, बेरोजगारी, महागाई, अनाथांचं एक करूण राष्ट्र दर्शनही होतं.
आजही मुंबईत या जीवनदायिनीचे हेच चित्र असेल पण आता जोडीला मेट्रोही आहे. समाजाचं थोडं फार वर्गनिहाय विलगीकरण झालं असेल पण ज्या ज्या वेळी “नऊ आठ” ची लोकल ट्रेन आठवते तेव्हा एक जाणवतं की ती नुसतीच माणसांची ने आण करणारी, रुळावरून धावणारी एक रेलगाडी नव्हती तर मानवी जीवनातल्या नऊ रसांचं भरभरून सत्यदर्शन देणारी ४५ मिनिटाची एक फिल्म होती आणि हो ! याच फिल्ममध्ये मॅनेजमेंटचा गुरु, पांढरी टोपी घातलेला मुंबईचा वारकरी डबेवालाही होता.
५० वर्षापूर्वीचा काळ आणि त्यानंतर बदलत गेलेला काळ यांची तुलना करताना वाटतं प्रवासी तेव्हाही होते आजही आहेत पण तेव्हाचा प्रवास “सुखद होता” असं जरी म्हणता येणार नाही तरी आजच्या इतका भयावह नव्हता. क्वचित एखादी “मंदा पाटणकर” बलात्काराची घटना सोडली तर तशी असुरक्षितता फारशी कधी वाटली नाही. चोर्यामार्या असतील, अपघात असतील पण त्यावेळी दहशतवाद नव्हता. बॉम्बस्फोट नव्हते. माणसातला माणूस जागा होता. म्हणून म्हणते त्यामानाने आम्ही खूप भयमुक्त प्रवास केला. नव जुनं, संस्कृती, परंपरा स्नेहबंध जोडत मुंबईच्या या एका वेगळ्या चलत जगाचा अनुभव घेतला.
किती तरी वर्षं झाली. मी मुंबईला गेले तरी आता लोकलने कधी प्रवास करत नाही. एकेकाळी खिडकीची जागा पकडण्यासाठी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचे साहस सहजपणे करणार्या मला आता आपल्याला गाडीत चढता तरी येईल का ? याविषयी शंका वाटते पण तरीही मनात एक इच्छा आहे एकदा तरी सकाळी ठाण्याहून सुटणाऱ्या “नऊ आठ”च्या गाडीची वेळ गाठावी. पुन्हा एकदा माणसांनी गच्च फुललेलं ते ठाणे स्टेशन पहावं आणि त्यात माझ्या अनेक हरवलेल्या आठवणी आणि माणसांना शोधावं…
क्रमश:

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800